तो तुम्हाला फक्त मैत्रीण मानत असेल तर त्याचाही स्वीकार करा. प्रत्येक
लव्हस्टोरीचा शेवट सुखद झालाच पाहिजे, असं काही नाही. त्यानेही आपल्या
विचारावर ठाम न राहता लग्नानंतरही ती आपली चांगली मैत्रीण कशी राहील,
याचा विचार करावा.
...
तानियाच्या बर्थ डे पाटीर्ला करणने तिला टायटनच घड्याळ प्रेझेण्ट केलं
आणि हे माझ्या स्वत:च्या पगारातून तुला पहिलंच गिफ्ट आहे, असंही
सांगितलं. दोघंही एका नामांकित कंपनीत कामाला. तशी त्यांची कॉलेजपासूनच
घनिष्ट मैत्री. दोघांची घरही जवळजवळ असल्याने करण रोज तिला आपल्या
बाईकवरून कॉलेजमध्ये घेऊन जाई. कॉलेजमधील सर्व मित्र-मैत्रिणी त्यांना
एकमेकांवरून चिडवत. पण, त्यावर करण 'आमची केवळ मैत्री आहे', असं ठामपणे
तर तानिया लाजत सांगत असे. पण, हे नातं मैत्रीपेक्षा जास्त असल्याचं
तानियाला जाणवलं. करणने आपण मित्र आहोत, तुझ्याबद्दल आपलेपणा वाटतो,
जवळीकता वाटते पण, लग्नाच्या बंधनात मला अडकायचं नाही, असं पटकन सांगून
टाकलं. 
त्यानंतर, करणशी जास्त बोलायचं नाही असा तानियाने निश्चय केला.
पण, करण नेहमीसारखाच तिला दररोज बाईकवरून ऑफिसला घेऊन जाण्यास येत होता
आणि त्याला 'नाही' कसं म्हणणार या विचाराने तीही त्याच्याबरोबर जात होती.
कधीतरी करणलाही आपल्याबद्दल प्रेम वाटेल, अशी आशा ती मनाशी बाळगून होती.
आज करणच्या गिफ्टमुळे तर ती अधिकच सुखावली होती पण, करण आपल्या विचारांशी
ठाम होता.
सर्वच मुली या कथेचा अंत 'लव आज कल'च्या शेवटासारखा (म्हणजेच आपलं
ज्याच्यावर प्रेम आहे हे त्याने अखेरीस कबूल करावं) सुखद व्हावा अशी
अपेक्षा करतात. खरं बघायला गेलं तर, पुन्हा जाणवतं ते म्हणजे मुलगा आणि
मुलगी दोघांत असलेला सायकलॉजिकल फरक.
मुलांना लग्न म्हणजे एक बंधन वाटतं. सर्वात जवळच्या मैत्रिणीबद्दल
त्यांना काळजी वाटते, तिचा सहवासही आवडतो. पण ती मैत्रीण न राहता जेव्हा
पत्नी होणार तेव्हा तिच्या अपेक्षाही बदलणार. म्हणजे आता एखाद्या मुलीशी
जर मी बोलत असेल तर कदाचित ती चेहरा वेडावाकडा करेल पण, लग्नानंतर मी
मुलींशी बोललेलं तिला आवडणारच नाही. प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं
लागणार, मित्रांबरोबर कधीही फिरण्यावर बंधन येणार, जबाबदारी घ्यावी
लागणार, सवयी बदलाव्या लागणार. यामुळे कटकट वाढणार. म्हणजे एकंदरीतच
मैत्रीण बायको झाल्यावर मला पूर्ण बदलणार. लग्नामुळे आपलं स्वातंत्र्य
हिरावलं जाणार... या विचारांनी लाँग-टर्म नात्याची लगेचच कबूली द्यायला
मुलं टाळतात.
याउलट, मुली जन्मताच भावूक असतात. एखादा मुलगा आपली काळजी घेतोय,
त्याच्याविषयी आपल्याला जवळीक वाटतेय म्हणजे हाच आपल्या जीवनाचा जोडीदार
असायला हवा असा तिचा अट्टाहास असतो. म्हणून अधिकाधिक ती त्या मुलात गुंतत
जाते. मैत्रीच्या नात्यात बंधन नाहीत, पण लग्नानंतर ती येतील याची मुलाला
भीती वाटते, म्हणून ते कमीटमेण्ट करत नाहीत. तर मैत्रीत काही बंधनं
नसल्यामुळे हा आपल्याला कधीही सोडून जाईल ही भीती मुलींना असते, म्हणून
त्या कमीटमेण्टचा आग्रह धरतात. मुलींच्या मते, लग्नासाठी प्रेम हेच
महत्त्वाचं, तर मुलांच्या मते लग्नानंतर प्रेम संपतं आणि सांभाळावे
लागतात ते खर्च आणि कुटुंबाच्या मागण्या.
अर्थात दोघंही आपल्या बाजूने बरोबर आहेत. कारण लग्नात प्रेम तर आहेच पण
त्यागही आहे आणि जबाबदारीही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा दोघांचा
निर्णय आहे. म्हणून आपल्या जोडीदाराला विचार करायला वेळ द्या. त्याचबरोबर
त्याच्या मताचाही आदर करायला हवा. तो मुलगा तुम्हाला फक्त मैत्रीण मानत
असेल तर त्याचाही स्वीकार करा. त्यात अडकून स्वत:ला कमी लेखून नैराश्य
ओढावून घेऊ नका. मुलांनीही आपलेच विचार योग्य आहेत यावरच ठाम न राहता
लग्नानंतरही ती आपली चांगली मैत्रीण कशी राहील, याचा विचार केला पाहिजे.
तसंच योग्य बंधनामुळे दोघांवरही मर्यादा येऊन जीवनाला एक चौकट मिळेल.
म्हणूनच हा विषय न टाळता परस्परांशी चर्चा करा.
- गौरी कोठारी
(सायकॉलॉजिस्ट अॅण्ड सायकोथेरपिस्ट)

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top