लव्ह मॅरेज असो की अरेंज.. लग्नावेळी मुलाकडून अनेक अपेक्षा ठेवल्या जातात. मुलगी मिळवती असली तरी घर, नोकरी, गाडी अशा गरजाही मुलानेच पूर्ण करण्याची

पद्धत आजही दिसतेय. संसार दोघांचा असेल तर, मुलींनी या पारंपरिक अपेक्षांवर एकदा नक्कीच विचार करायला हवाय.

    नम्रता वय वर्षं २० आणि आदित्य वय वर्षं २२ फक्त... दोघंही एकमेकांसाठी प्रेमात वेडी झालेली. समजून उमजून वागणाऱ्या कपलमध्ये फक्त गफलत होत होती ती अपेक्षांमध्ये... विशेषत: नम्रताकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षांमध्ये. स्वत:चं घर, शक्य असल्यास एकुलता एक, उत्तम मासिक उत्पन्न या लग्नापूवीर्च्या बेसिक अपेक्षा मुलाकडून केल्या जातात. त्या सगळ्याच पूर्ण करण्याचा तो परोपरीनं प्रयत्नही करत असतो. आदित्यचीही अशाच प्रकारची ओढाताण होत होती. आदित्यनं नोकरीच्या ठिकाणाच्या जवळच वन बीएचकेचा ब्लॉक घेतलेला. स्वत:च्या जिवावर... पण त्यानं थोडं लांब घर घेतलं असतं तरी चाललं असतं. ब्लॉक थोडा मोठा मिळाला असता. ही तिची तक्रार.

लग्न व्हायच्या आत त्याचं सेटल होणं मुलींच्या पालकांबरोबरच तिलाही गरजेचं वाटत होतं. समवयस्क असल्याने प्रगतीचा आलेख एकाच रांगेने जाणं साहजिक आहे. मात्र केवळ तो मुलगा आहे म्हणून त्याचं सेटल होणं गरजेचंच आहे असं तिचंही मत होतं.

- काही पारंपरिक अपेक्षा

दरवेळी मुलांनीच आधी घर घेऊन ठेवायचं. त्यांनी लग्नाआधीपासूनच सेटल असलं पाहिजे हा अट्टाहास ठेवणं खरंच कितपत योग्य आहे? मुलीही तितक्याच कमावतात. क्वचितप्रसंगी मुलांपेक्षा जास्तही. मग मुलींनीही घराच्या उभारणीसाठी हातभार लावला आणि त्या घराला 'त्याचं' न ठेवता 'आपलं' म्हटलं, तर बिघडलं कुठे? अर्थात, मुलाच्या वाडवडिलाजिर्त घरातच राहाण्याची तिची तयारी असेल, तर काहीच प्रश्न नाही. मात्र, वेगळं राहायचं ठरवलं असेल, तर तेवढाच पगार स्वत: मिळवत असतानाही घर केवळ त्याचंच असावं ही अपेक्षा असायलाच हवी का?

   - 'गर्ल कॅन ऑल्सो बी ए मॅन इन द फॅमिली' असंही असू शकतंच की. स्वत: ठामपणे निर्णय घेण्याची क्षमता असलेली एखादी मुलगी नवऱ्याच्या घरच्यांना सांभाळूनही महत्त्वाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडू शकतेच की. मात्र, आपणहून घेतलेल्या निर्णयांना नवऱ्याचा पाठिंबा असावा, (अगदी पूवीर् बाबा देत असत तसा) अशी अपेक्षा मुली ठेवत असतील, तर अर्थातच त्यात काही गैर नाही. फक्त हे मुलांनीही समजून घ्यायला हवं.

  - मुली किंवा मुलंही जर लवकर कमिटेड स्टेटसमध्ये आली, तर अनेकदा हे अडथळे जाणवतात. किंवा मग मुला-मुलीच्या वयातलं अंतर कमी असेल, तरी त्यांना अडचणी सोडवताना त्रास होऊ शकतो. एकमेकांना अभ्यास, करिअरमधली स्टॅबिलिटी या सगळ्या व्यापात वेळ देणं कठीण होऊन बसतं आणि अगदीच छोट्या-मोठ्या कारणांवरूनही क्वचितप्रसंगी भांडणं व्हायला लागतात.

  प्रत्येकाचं रिलेशनशिप स्टेटस वेगळं असतं. तरीही मुलांकडूनच अनेकदा बक्कळ अपेक्षा ठेवल्या जातात. कोणत्याही क्षेत्रात मुली जेव्हा मुलगी म्हणून मला वेगळा न्याय लावता कामा नये असं म्हणतात तीच बाजू संसारात मात्र, तशीच ठेवायला त्यांची ना असते (अर्थातच, अपवाद वगळता). गाडी त्यानं खरेदी करायची. घरंही त्याचंच हवं. कापड खरेदी त्याच्या पैशानं हवी. यापेक्षा दोघांचा एकत्र संसार आहे, या विचारातून अनेक गोष्टी सहज सोप्या होत जातील, नाही का?

मुंबई टाइम्स टीम

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top