किती किती स्वप्ने पाहिली होती मी..
तू आलास की..
काही व्यक्त काही अव्यक्त
बोलत बसायचं..
कधी हसायचं तर कधी
उगाचच रडायचं..
काही असं बोलायचं तर
तसं बोलायचं काही..
तू निघतो म्हणशील तेव्हा..
तुला जाऊच द्यायचा नाही..





तू आलास अन
लगेच निघालासही..

या अपुऱ्या क्षणांत मग
भेटायचं राहूनच  गेलं..
ओठांवर साचून राहिले शब्द,
बोलायचं राहूनच गेलं..
वाटलं,पकडावा तुझा हात
अन चिडावं थोडं..
"तुझं हे नेहमीचेच" म्हणत,
रडावं थोडं..
पण,
बुद्धी भलतीच विचारी..
म्हणाली..
"असं का करतात वेडे..?
निरोप देताना हसावे थोडे.."
मग,दाटून आलेला गळा..
तरीही घातला बांध मनाला
हसत निरोप देत ,
हालवत राहिले हाताला..
तू दूर जाईपर्यंत हसू
मावळू दिलं नाही..
डोळ्यांतले पाणी पापण्यांनाही
कळू दिलं नाही..

अस्वस्थ मनाने,
परत माघारी फ़िरले तेव्हा..
अंगणभर..
प्राजक्ताचा सडा पडला होता..
तू निघताना..
तोही बहुधा..
मुक्यानेच रडला होता..


टिप्पणी पोस्ट करा Blogger

  1. गेला सुटून हात तुझा हातातुन माझ्या।
    जणू नाहलो मी अश्रुत माझ्या।।
    नाही आलीस जीवनात।
    पण येशील का स्वप्नात माझ्या।।
    मला काय माहीत तु एक आग होती।
    जळुन झाली राख स्वप्नांची माझ्या।।
    केले होते प्रेम अपार तुझ्यावर मी।
    तु नाही जाणले भावनांना माझ्या।।
    अर्थ न देता अर्थास आता अश्रु झालीस डोळ्यात माझ्या।
    चक्रवात गेलो मी हरवुन ही तुझी वाट गेली पायातुन माझ्या।।

    उत्तर द्याहटवा

 
Top