मुके झाले ओठ तरी
डोळ्यांनी तू बोलून जा,

जाता जाता माझ्या मनात
एखादं मोरपिस ठेवून जा,

बोलायचं नसलं माझ्याशी तर,
हात तरी हालवून जा,

माझ्यासाठी निदान स्वतःची
समजुत तरी घालून जा,

जाणार आहेस तू तर,
अंगणात क्षणभर थांबून जा,

अन् अश्रू ढाळून निरोपाची,
रीत तरी, पाळून जा,

एवढं करणार नसशील तर,
ओल्या आठवणी ठेवून जा,

अन् ह्रदयावर विरहाचे खिळे
ठोकून जगण्याची शपथ तरी घालून जा......

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top